Wednesday, 5 October 2022

माणूसपण ' हरवत 'चाललय..!

📌📌

 ....धकाधकीच्या जीवनात माणसाचं ' माणूसपण ' हरवत चाललंय का ? असा प्रश्न आज सारखा माझ्या डोक्यात घोंगावतोय...एकमेकांशी असलेले ऋणानुबंध कमी झाले, भेटी - गाठी दुरावल्या..नाते संबंधात दुरावा निर्माण होवू लागला.. एकमेकांवरील विश्वास वाढण्याऐवजी कमी होवू लागला..पण यात दोष कोणाला देणार..प्रत्येकाच्या मागे व्याप वाढलेला आहे, स्वतःच एक विश्व माणसाने तयार करून घेतलंय..या विश्वाच्या बाहेर तो निघायला तयार नाही.. एकाकी व एकटेपणाचे जीवन त्याला सुंदर वाटू लागले..हे सगळं करून त्यानंतर तो बाहेर पडायला बघतो, तेव्हा त्याचा आपला कुठेतरी दूर निघून गेलेला असतो..असं काहीसं सध्या माणसांच्या बाबतीत घडतंय..आपल्याकडून अनेकांना विविध अपेक्षा असतात.. माणसाने एकमेकांशी भेटावं, बोलावं , मनमुराद गप्पा माराव्यात..पण आजच्या धकाधकीच्या या जीवनात संसाराच राहट गाडगं ओढतांना होणारी दमछाक बघता हे शक्य होत नाही..पण तरीही कुठेतरी या संसाराच्या चक्रव्यूहातून माणूस बाहेर पडू पाहतो.पण त्यावर अविश्वास दाखवला जातो, त्याला समजून देखील घेतलं जात नाही..पूर्वी आणि आता अशी त्याचेशी तुलना केली जाते..माणूस जसा आहे तसाच असतो, त्यात तर काही बदल होत नाही..हा थोडा फार स्वभाव बदलतो मात्र यामध्ये कुठं एवढं आभाळ कोसळलेलं असतं..एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा देखील पूर्ण झाल्या पाहिजे असे वाटतं असलं तरी अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकांवर रुसनं.. त्याच्याशी न बोलणं असे देखील प्रकार घडत असतात..खरं तर आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीकडून काही अपेक्षा आपण ठेवलेल्या असतात त्या जेव्हा पूर्ण होत नाही त्यावेळी स्वाभाविकच त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात राग निर्माण होतो..परंतु समोरील व्यक्ती ही हेतू पुरस्कर आपल्याशी वागते आहे की, त्याची काही अडचण आहे हे आपण समजून घेतले पाहिजे..त्या विषयावर त्या व्यक्तीशी संवाद साधला पाहिजे, त्या व्यक्तीला त्याच्या भावनांविषयी जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं, आपल्या मनामध्ये समोरच्या विषयी असलेले गैरसमज दूर केले पाहिजे..पण हल्ली तसं होत नाही.. होतांना दिसतही नाही म्हणून माणसा - माणसांमध्ये दुरावा, अंतर निर्माण होत आहे..आज काल माणसांच्या स्वभावातही फार बदल झाले..ज्यांना आपलं म्हणाव, ज्यांच्यावर म्हणून विश्वास ठेवावा ते ही कधी कधी आपल्याशी हातचं राखून वागतात..हे सगळचं आता माणसांच्या नशिबी यायला लागलयं..पण या सगळ्या गोष्टींवर ' मंथन ' व्हायला पाहिजे..आजच्या दिवशी मनातील कटुता, राग, द्वेष, हेवे - दावे रुपी रावणाला दहन करून प्रेमाने, सद्भावणेने एकमेकांविषयी असलेला पुर्वीचाच आदर दृढ करून मनात असलेल्या नकारात्मक दृष्टीकोणावर विजय मिळवूया..आणि नव्याने आजच्या दिवशी चांगल्या भावनांचे तसेच विचारांचे सोने लुटून दसरा साजरा करूया...!
दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

- संदीप जेजुरकर,
  नांदगाव ( नाशिक )

Tuesday, 5 July 2022

#ऋणानुबंधाच्या_अशा_ह्या_गाठी...

#ऋणानुबंधाच्या_अशा_ह्या_गाठी...

....अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने २०१३ यावर्षी ' शेषनाग झील ' येथे एका अनोळखी माणसाशी मैत्री झाली..अन् त्या माणसाला तब्बल ९ वर्षानंतर पुन्हा अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने जम्मूमध्ये भेटण्याचा योग आला..अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय अशी ही भेट ठरली.

......खरं तर आमची मैत्री झाली ती अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने...साधारण वर्ष असेल २०१३ चे..अमरनाथ यात्रेमध्ये महत्वाचे मानले जाणारे मध्यवर्ती ठिकाण असलेले ' शेषनाग झिल '..( भगवान शंकराने अमरनाथ गुफेकडे जातांना आपल्या गळ्यातील शेषनाग जिथं सोडला ते ठिकाण म्हणजे शेषनाग झील..) या ठिकाणी जोगेश भारद्वाज या व्यक्तीशी थोड्या गप्पा मारतांना या अवलीयाशी ओळख झाली..मूळचे राजौरी, जम्मू येथील रहिवासी असलेला जोगेशजी जम्मू पोलिसांत कार्यरत आहे..ओळख होण्यामागचे कारणही थोडेसे वेगळेच आहे..२०१३ यावर्षी चंदनवाडी येथून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाल्यानंतर शेषनाग येथे एक मुक्काम पडला..' मोसम साफ ' ( स्थानिक वापरण्यात येणारा हा शब्द आहे ) नसल्याने दुसऱ्या दिवशीही तेथेच मुक्कामी रहावे लागणार होते..मुक्काम वाढला म्हणजे खर्चही वाढणार होता..साधारण टेंट मध्ये राहण्यासाठी २५० /- प्रती बेड पैसे वाढणार होते..म्हणून विचारून बघावं, यात्रेतील पुढचा टप्पा ' पंचतर्णी ' कडे जाता येईल का ? म्हणून गेटकडे गेलो..तर तिथे माझ्या आधीच ' आम्हाला पुढे जाऊ द्या ' म्हणून डोकं लावणारे अनेक यात्रेकरू होते..सगळ्यांची तीच अडचण होती, जी माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांची होती..तिथं हे व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीला उत्तरे देत होते..अनेक यात्रेकरू तर आक्रमक होत त्यांच्या अंगावरही जात होते...मात्र चिडचिड न करता जोगेश शांततेत उत्तरे देत होता..सायंकाळ झाली तसे लोक आपापल्या टेंट मध्ये परतू लागले..मग मी ह्या अवलियाकडे जावून बसलो..थंडी खूप असल्याने शेकोटी सुरू झाली..अन् मी आणि जोगेश आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली..दिवसभरात कसे यात्रेकरू येतात, त्यांना काय - काय डोकं लावावे लागते, तसेच दिवसभर विचारपूस करणारेही खूप लोक असतात प्रत्येकाला समाधानकारक उत्तरे द्यावे लागतात..मोसम साफ नसल्याने यात्रेकरूंच्या जीवाला धोका होवू शकतो म्हणून आम्ही त्यांना पुढे जावू देत नाही मात्र यात्रेकरू हे समजूनच घेत नाही असे सांगताना थोडी चिडचिड होते पण ' ड्युटी ' असल्याने सर्वांना सांभाळून घेत शांतता ठेवावी लागते व नम्रपणे उत्तरे द्यावी लागतात.असे त्याने सांगितले..त्यांची व्यथा जाणून घेतल्यावर मी ही त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला..मग तर त्याने खूप काही सांगायला सुरुवात केली अन् आमची गप्पांची मैफिल पहाटेपर्यंत रंगतच गेली..सोबत ' कावा ' ( चहाचा प्रकार ) दूध, चहा हे सगळे सुरूच होते..विचारांची देवाण - घेवाण झाल्यानंतर साहजिकच मोबाईल नंबरही आम्ही एकमेकांना दिले...दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा भेटलो त्यावेळी त्यांनी सोबतच गुफेकडे दर्शनाला जावू या म्हणून आग्रह केला..मात्र पहाडी मार्गाने जातांना केवळ तीन - चार तासांत आपण पोहोचून जावू असे त्यांनी मला सांगितले, म्हटल आपल्याकडून येवढं शक्य नाही..म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो नाही..पुढच्या चार - पाच तासांत त्यांचा मला कॉल आला की दर्शन झालं म्हणून..अर्थात ड्युटीमुळे त्याला तो भाग नवीन नव्हता म्हणून ते झटपट चालत गेले..तेव्हापासून तो आजतागायत माझ्या संपर्कात आहेत आणि मीही त्यांच्या संपर्कात...आमचं नेहमी मोबाईलद्वारे बोलणे होत असते..या भागात यात्रेला यायचं म्हटल की मला जोगेशची आठवण आल्याशिवाय राहत नाही.. २०१३ नंतर अनेकदा जम्मू काश्मीरकडे येणं झालं..मात्र त्यांची ड्युटी कारण तसेच आपल्या प्रवासादरम्यान मार्ग बदलत जात असल्याने भेट होत नव्हती..यावर्षीही मी अमरनाथ यात्रेला येणार आहे असे सांगितल्याने जोगेश जी खुश झाले..संदीप सर, ये साल किसी भी हालातमे हमें मिलना है, और आपको मेरे घर आणा है..मैं आपकी कूछ भी नहीं सूनुंगा..असे त्याने सांगून टाकले..मी ही यावर्षी आपण नक्की भेटूच असे त्याला सांगितले अन् कधी भेटायचं ही तारीखही ठरली..अमरनाथ यात्रेचं शेड्युल ठरलं..अन् प्रवासही सुरू झाला, दोन रात्री आणि एक दिवस प्रवास करून जम्मूत पोहोचलो..पण प्रवासामुळे थकून गेल्याने जम्मू मधून थेट ' कटरा ' येथे हॉटेलला पोहोचलो..फ्रेश झालो..अन् मग मित्र जोगेशला ' कॉल ' केला..आणि कटरा पोहचलो असे सांगितले..मित्र थोडा नाराज झाला..आपने ये गलत किया, आप मुझे मिलने जम्मू आणेवाले थे, आप तो रुकेही नहीं असे म्हणत तो नाराज झाला..त्याच्या बोलण्यात आमच्या भेटी विषयी तळमळ दिसत असल्याने मी म्हटलं मी येतो भेटायला.. खरं तर जम्मू ते कटरा हा दिड ते दोन तासाचा प्रवास असल्याने मी येणार नाही असे त्याला वाटले..तो ही निराश होत, आप नही आयेंगे, मैने तो घरमे ही बोल दिया है..आप आणेवाले है...आणि तो ड्युटी निमित्ताने जम्मूमध्ये एकटाच राहत असतांना त्याने त्याचे आई वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी अशा सगळ्यांना त्याच्या रूमवर बोलावून घेतलं होतं..मग मीही त्याला भेटण्यासाठी कटरा येथून जम्मुकडे बसने रवाना झालो..जम्मू मधील बसस्थानक जवळ असलेल्या ' त्रिकुटा ' येथील संकुलाजवळ आम्ही भेटायचं ठरवलं..तब्बल ९ वर्षांनी आम्ही भेटणार होतो..भेटीची उत्सुकता खूप होती त्यालाही अन् मलाही..मी बसस्थानकाजवळ ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो तसा त्याला कॉल केला..अन् पुढच्या पाच मिनिटांत तो दुचाकीवर तिथे दाखल झाला.. जसं त्याने मला बघितलं तशी त्याला गाडी लावण्याची सुद्धा घाई झाली..अन् लगेचच माझ्या गळ्यात पडला..राम - भरत भेट व्हावी तशी आमची भेट झाली, दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता .केवळ एकदा भेटल्यानंतर तब्बल ९ वर्षांनी आम्ही भेटलो होतो..भेटल्यानंतर आम्ही मग दुचाकीवरून त्याच्या घराकडे मार्गस्थ झालो..३ किलोमीटरच्या प्रवासात घरच्यांची त्याने आपुलकीने व आस्थेने चौकशी केली..अगदी जवळच्या माणसांसारखी... भगवती नगर येथे त्याच्या घरी पोहोचलो..घरी पोहोचल्यानंतर सर्व प्रथम त्याची मुलं जवळ आली, अन् ' अंकलजी नमस्ते ' करत माझ्या पायाकडे झुकले...एवढ्या कमी वयात त्यांचेवर किती चांगले संस्कार झालेले आहे हे पाहून मन भारावून गेले..दरवाजात पाय टाकताच जोगेशचे आई - वडील भेटले, त्यांचं पहिलं वाक्य हे होतं की, बेटा आणे मे कोई दिक्कत तो नहीं आयी..चलो अब फ्रेश हो जाओ... औंर आरामसे बैठो अपनाही घर समझो..घरात बसल्यावर लगेचच जोगेशची पत्नी पाणी आणि थंड शरबत घेवून समोर उभी राहिली..कैसे हो भैय्या, घर में सब ठिक - ठाक चल रहा है ना..असे म्हणत तिनेही चौकशी केली..मग सगळे एकत्र बसून गप्पा सुरू झाल्या..काही आपले शब्द त्यांना कळत नव्हते, तर त्यांचे काही शब्द मला कळत नव्हते..पण जोगेश आमचा मीडियेटर म्हणून आमच्यामध्ये दुवा साधत होता..जोगेशचे वडील ओमप्रकाशजी हे सुभेदार म्हणून सेवा निवृत्त झालेले..त्यांनी देशभरातील अनेक राज्यात सेवा बजावली असल्याचे अभिमानाने सांगत होते..महाराष्ट्रात मुंबई आणि देवळाली येथे देखील सेवा काळात येणं झालं होत असे सांगितले..गप्पांची मैफिल उत्तरोत्तर रंगत असतांनाच जोगेशच्या पत्नीने आवाज दिला..बाते बाद में करो पहले खाणा खालो.. जोगेशच्या वडिलांनी आपल्या सुभेदारी काळात काय - काय काम केले हे सांगत थोडेसे औषध देखील घेतले..मग काय घरातील होम थिएटरवर ' किशोर कुमार' चे गाणे लावा म्हणून फर्मान सोडले ..आणि किशोरदाच्या गाण्याबरोबरच सुग्रास अशा जेवणालाही सुरुवात झाली..काय जेवणार हे न विचारताच जोगेशने ' चिकन ' ची व्यवस्था करून ठेवली होती..जेवणावर यथेच्छ ताव मारल्यानंतर पुन्हा गप्पांची मैफिल रंगली, जोगेशचा मुलगा गर्व याने माझ्यासोबत एक व्हिडिओ देखील तयार केला.तसेच संपूर्ण कुटुंबीयांनी माझ्यासमवेत फोटोही घेतले..मला निघायचं आहे असे सांगितल्यावर पूर्ण फॅमिलीच भावूक झाली, अरे अभी तो आये हो..अब दो - चार दिन यही रुकना..जोगेश तुम्हे पुरा जम्मू घुमा के लायेगा..असे म्हणत मला तिथेच थांबण्याचा आग्रह करू लागले, घरातील मुलही अंकल रुक जावो ना चा नारा लावून होते..पण शेड्युल ठरलेले असल्याने व इतर सगळे मित्र मी कटरा येथे थांबविले असल्याने मला जावे लागणार होते..मग मी त्यांची परवानगी घेवून निघालो, संपूर्ण कुटुंब मला घराबाहेर सोडण्यासाठी आले..जोगेशजी ने दुचाकीला किक मारली अन् आम्ही पुन्हा जम्मूच्या दिशेने निघालो..पुढे जावून जोगेशने मला दुचाकी चालवायला दिली. मग आम्ही दुचाकीवर जम्मुची सैर करू लागलो..जम्मू बस स्थानकावर पोहोचल्यानंतर मी जातो असे सांगून जोगेशचा निरोप घेतला मात्र गाडीत बसून मी परतेल असे म्हणत जोगेश मला गाडीत बसून देईपर्यंत तिथेच थांबला..गाडीत बसवलं मगच तो परतीच्या प्रवासाला निघाला..रात्री उशीर झाल्याने गाडी कटरा येथे पोहोचेपर्यंत सारखं काळजीपोटी कॉल करून तो मला विचारत होता.मध्यरात्री एक वाजता मी हॉटेलात पोहोचल्यानंतर सुखरूप पोहोचलो म्हणून त्याला सांगितल्यानंतर मग तो निवांत झोपला.. खरं तर अशी मैत्री करणारी व जोपासणारी माणसं फार दुर्मिळच..केवळ एका भेटीत एवढा विश्वास दाखवत एवढा चांगला पाहुणचार व घरातली माणसंही एवढ्या आदबिने माझ्याशी वागली..खूप छान वाटलं अगदी मनाला भावून गेलं..आणि हा महाराष्ट्र भेटीचं आवतंन देवून पुढची भेट लवकरच घेवू असंही ठरलं बरं का..

संदीप जेजुरकर
नांदगाव ( नाशिक )

Sunday, 12 September 2021

बाप्पा गणराया कुणालाही जास्तीच दुःख देवू नको देशील तर सुख आणि दुःख हे समांतरच दे...

📌📌

बाप्पा गणराया कुणालाही जास्तीच दुःख देवू नको देशील तर सुख आणि दुःख हे समांतरच दे...

           देवाने माणसाला जे काही आयुष्य दिलंय ना..ते सुख आणि समाधानाने समांतर असे भरलेले द्यायला हवे होते..खूप सारे लोक या धरतीवर जगतात पण त्यातील अनेकांच्या नशिबी दुःख हे खचून भरलेलं असतं.. सुख हा शब्दच त्यांच्या नशिबी नसतो..दुःख बाजूला सारून सुख शोधायला ही माणसं जेव्हा निघतात तेव्हा त्यांच्या वाट्याला अगदी क्षणिक सुख येतं..पण काही वेळातच दुःखाचा मोठा डोंगर त्यांच्या पुढ्यात उभा असतो..खरं तर परमेश्वर प्रत्येकाला काही काळ जगण्याची संधी देत असतो..या काळात सुख आणि दुःखाचा हिशोब परमेश्वर ठेवत असतो..मग हा हिशोब ठेवत असतांना कुणाच्या वाट्याला किती दुःख येतंय अथवा सुख येतंय हे त्या परमेश्वराच्या लक्षात येत नसेल का ? परमेश्वराची भक्ती केल्याने निरंतर समाधान मिळतं असंही म्हटलं जातं परंतु या जगात असे अनेक भक्त आहेत ज्यांनी अगदी परमेश्वर भक्तीमध्ये वाहून घेतलंय. पण अशा लोकांच्या वाट्याला सुद्धा मोठं दुःख आल्याचं आपण बघितलंय.. चांगली कामे करा, कामात परमेश्वराला शोधा, त्यातच सुख आहे असही आपण नेहमीच संतमंडळींकडून ऐकत असतो.पण चांगलं वागूनही शेवटी नशिबात दुःख हे येतचं..मग याला नेमकं काय म्हणायचं..आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन झाले की माणूस सुखी होतो पण अनेकदा असं घडत की आत्म्याचे आणि परमात्म्याचे मिलन करता करता अनेकजण इहलोकी निघून जातात तरीदेखील त्यांचं मिलनही पूर्ण होत नाही आणि सुखही त्यांना शोधता येत नाही.. विश्वाच्या या सुख दुःखाच्या चक्रव्यूहात माणूस अडकून भरडला जातोय..निरंतर अशा सुखाच्या शोधात निघतांना दुःखाच्या खाईत तो लोटला जातोय..सुखाची नेमकी व्याख्याच इथं समजत नाहीये..खूप ताण तणाव वाढताय..अनेक विचार डोक्यात घोळताय..असो आयुष्यात येणाऱ्या सुख - दुःखाच्या लाटाच आपल्याला अनुभवसमृद्ध करतात असं म्हटलं जातं..पण अनुभव किती घ्यायचे यालाही काही मर्यादा ठरवून दिल्या पाहिजे..म्हणून आज गणरायला सांगणं आहे..बाप्पा गणराया कुणालाही जास्तीच दुःख देवू नको देशील तर सुख आणि दुःख हे समांतरच दे...🙏🏻


संदीप जेजुरकर, नांदगांव ( नाशिक )

Sunday, 5 July 2020

...अशी झाली इंद्रायणी किल्ल्याची भटकंती

....अशी झाली इंद्रायणी किल्ल्याची भटकंती..
      - संदीप जेजुरकर, नांदगांव ( नाशिक )

घनदाट झाडी, निर्मनुष्य रस्ता , त्यातच दाट धुकेही अन आमचा रस्ता चुकलेला..किल्ला कसा शोधायचा या विवंचनेत असतांनाच माणसांचा आवाज कानी आला..त्या आवाजाच्या दिशेने पुढे सरकत असतांनाच किल्ल्यावर जाण्याचा मार्ग मिळाला..या दरम्यान, थोडीशी भीती आणि थरारही अनुभवला..

       निसर्गसौंदर्य खुललं की कुठेतरी भटकंतीला निघायचं हे आमचं नेहमीचंच ठरलेलं..सुटीचा दिवस बघायचा आणि घराबाहेर पडायचं..पण भटकंतीतही किल्ल्यालाच आमची प्रथम पसंती असते..कारण किल्ल्यावरील ऐतिहासिक माहितीचा ठेवा , हिरवाईने नटलेलं निसर्ग सौंदर्य , आणि किल्ल्यावर चढाई करतांना लागणारी शारीरिक मेहनत या तिन्ही गोष्टी साध्य होतात.. भटकंतीसाठी यापूर्वी न बघितलेला सह्याद्रीच्या कुशीतील सातमाळ डोंगररांगेमधील  इंद्रायणी किल्ला ( चांदवड जि. नाशिक ) निवडला..अन पहाटेच नांदगावहून मित्र प्रा.शिवाजी पाटील , मंगलसिंग सोनवणे अन मी ( संदीप जेजुरकर ) असे तिघेजण दुचाकीवरून निघालो.. चांदवडहुन सुनील खंदारे व गोपाल राठोड यांना सोबत घेऊन किल्ल्याकडे प्रस्थान केले.वडबारे गावातून किल्ल्याकडे जाणारी वाट धरली आणि आमचा प्रवास मातीच्या रस्त्यावरून सुरु झाला..दूरपर्यंत खडतर अशा रस्त्यावरून उंचावर दुचाकीने गेल्यानंतर आपण रस्ता चुकलो असे वाटायला लागले.कारण किल्ल्याकडे जाणारे कोणीच दिसत नव्हते ना गाड्या दिसत होत्या..आणि आम्हीही पहिल्यांदाच या किल्ल्यावर जात होतो..मात्र उंचावर गेल्याने दाट धुके, थंडगार वारा, थोडीशी पावसाची बुरुबुर सगळं काही थंड - थंड असे वातावरण तयार झाले होते..त्याच वातावरणाचा आनंद घेत चांदवड पोलीस व आमचे मित्र बिन्नर भाऊ यांना कॉल करून रस्त्याची माहिती विचारली त्यांनीही रस्ता चुकला असल्याचे सांगितले.आता काय करायचं या विवंचनेत असतांनाच गोपाल राठोड यांनी सांगितलं की या  इंद्रायणी किल्ल्यावर जाण्यासाठी वेगवेगळे तीन रस्ते असल्याचे सांगत आपण जात असलेला रस्ता देखील बरोबर आहे आपण निघुया म्हणत आणखी पुढे जायला निघालो..सगळीकडे धुके पसरलेले असतांना हिरवळीमधून केवळ एक पायवाट शोधायची आणि त्या दिशेने वाटचाल करत पुढे निघालो कारण आजूबाजूला धुक्यामुळें काहीच दिसत नव्हतं..दुरपर्यंत प्रवास केल्यानंतर एका निर्जन ठिकाणी दुचाकी थांबवल्या..मात्र धुकं खूप जास्त असल्याने कुठेही किल्ल्याचा मागमूस दिसत नव्हता..आलोच आहे तर किल्ला शोधायचाच हा चंग बांधला आणि बाजूच्या घनदाट झाडी असलेल्या डोंगरावर चढाई सुरू झाली जिथे रस्ताच नव्हता..बघता - बघता दोन मोठं मोठे डोंगर पार करून गेलो मात्र तरीही किल्ला दिसत नव्हता..काय करावं कळत नव्हतं तरीपण आलोच आहे तर किल्ल्याचे दर्शन घेऊनच जायचं ठरवलं होतं म्हणून पुन्हा पायवाट शोधत पुढे निघालो..काही अंतर कापल्यानंतर दोन माणसांमध्ये सुरू असलेला संवाद कानावर पडला..मग आमच्याही जीवात जीव आला.आणि आम्ही आरोळी ठोकत त्यांना आम्हाला किल्ल्यावर यायचं आहे रस्ता कुठून आहे असे विचारलं त्यांनीही केवळ सरळ पायवाटेने या एवढं सांगितलं..म्हणजे आम्ही निवडलेला मार्ग योग्य होता याची खात्री झाली आणि पुढे निघालो.समोरून येणाऱ्या आवाजाच्या दिशेने वाटचाल करत असतांना समोर एक मोठा डोंगर दिसला हाच किल्ला असावा म्हणून आम्ही त्या दिशेने पुन्हा वाटचाल सुरू केली थोडंस धुकं कमी झाल्यावर बघितलं असता किल्याचा पहिल्या पायरीवरच आम्ही जाऊन पोहोचलो होतो..किल्ला दिसत नसतांना आणि  रस्ताही भटकलेलो असतांना जी मनात भीती होती ती किल्लाची पहिली पायरी बघितल्यावर क्षणार्धात निघून गेली..दोन डोंगरात कोरलेल्या १०० तेे १२५ पायऱ्या लक्ष वेधून घेत होत्या.त्यातील पहिल्याच पायरीवर बसून थोडीशी विश्रांती घेत पुढे निघालो..पायऱ्या चढून गेल्यानंतर सगळीकडे हिरवळ आणि धुके दिसत असतांना त्या धुक्याचा आनंद घेत असतांना चांदवडचे मित्र बिन्नर भाऊ व त्यांची संपूर्ण टीम किल्ला उतरून खाली येतांना भेटली..मस्त गप्पा झाल्या.किल्ल्यावर काय बघायचं हे त्यांनी सांगितलं आणि आम्ही पुन्हा पुढे चालू लागलो.किल्ल्यावरील धुक्यांमुळे रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने किल्ल्यावरील भगवान शंकराच्या मंदिराचा मॅप लावून चालू लागलो..हळू हळू किल्यावरील भग्नावस्थेत असलेल्या काही वास्तू दिसू लागल्या..योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे असे समजून तेथील कोरीव दगडांचे छायाचित्र टिपत पुढे मार्गस्थ झालो..बिन्नर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एक शेततळ्यासारखे कोरीव तळे दिसले मात्र दोन डोंगर पार करून गेल्यावरही मंदिर मात्र दिसेना.. पुन्हा मॅपची मदत घेत पुढे निघालो..चालत चालत थेट किल्ल्याच्या टॉपवर जाऊन पोहोचलो. मॅपवर पुन्हा बघितले असता मंदिर क्रॉस करून पुढे आल्याचे त्यात दर्शविले..आम्ही जिथे पोहोचलो तिथे एका छोटीशी दर्गा व काही दगड दिसले..दर्ग्याजवळील हिरवा झेंडा खाली पडलेला असल्याने आम्ही तो व्यवस्थित केला आणि तेथील थंड व जोराने वाहत असलेल्या हवेचा आनंद घेतला.तेथून खाली बघितले असता अतिशय खोल अशी दरी दिसत होती.. किल्ल्यावरील मंदिर शोधायचं असा चंग बांधून मंदिर शोधायला सुरुवात केली.मात्र मंदिर काही सापडेनाचं..बिन्नर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे दुसरी एखादी वास्तू सापडेल म्हणून ती शोधू लागलो पण ती ही खूप दूरपर्यंत चालून गेल्यावर सापडलीच नाही.आता काय करायचं या विवंचनेत असतांनाच हिरव्या गार झाडींमध्ये डोंगराची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी करवंदाच्या जाळ्या दिसल्या..मग काय झाडावरील ताज्या आणि जिभेचे चोचले पुरविणाऱ्या करवंदाचा आस्वाद घेऊन पुन्हा मंदिर शोधू लागलो..गोपाल राठोड आणि मंगलसिंग सोनवणे यांनी चालण्याचा वेग वाढवून मंदिर शोधण्यास सुरुवात केली आणि मंदिर शोधलेही..आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेत दगडात कोरलेल्या मंदिराच्या भिंती खांब आदी मोबाईलमध्ये कैद केले.दर्शन झाल्यानंतर आलेला संपूर्ण थकवा दूर पळून गेला आणि आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो..परतत असतांना पुन्हा आमची वाट चुकली..किल्ल्यावरून खाली कसं जायचा हेच समजेना.. आम्ही पाचही जण किल्ल्यावरून खाली जाण्याचा रस्ता शोधू लागलो पण रस्ता काही सापडेना..पुन्हा मॅपची मदत घेतली तरीही लक्षात येईना..अशातच डोक्यात वीज चमकून गेली की पूर्वीच्या काळात शत्रूंना चकवा देण्यासाठी असे काही मार्ग केले असावे ज्यामुळे किल्ल्यापर्यंत पोहचण्यास शत्रूंना अडचण होईल..आणि त्यांच्या काही हालचाली बदलल्यास त्यांना ताब्यात घेतले येईल असे मनोमनी वाटले.मंगलसिंगने ही तशी जाणीव करून दिली की आपल्यालाही चकवा बसला आहे..आता काय करायचं..? किल्ल्यावरून उतरायचा रस्ता कुठे शोधायचा असा विचार करत बसलो..धुकेही कमी होत नव्हतं म्हणून काहीच दिसत नव्हतं..या धुक्यातच आम्ही रस्ता शोधण्यासाठी तब्बल दीड ते दोन तास घालवले..पण रस्ता काही सापडेनाचं..तेवढ्यात एका भग्नावस्थेतील चौथऱ्यावर फोटो काढलेली जागा मला दिसली..आणि लगेचच रस्ता आठवला..पण मी सांगितलेला रस्ता चुकीचा आहे असे म्हणून कोणीही मान्य करत नव्हतं..परंतु मग सुनील खंदारे आणि शिवाजी पाटील यांना रस्ता बघून या म्हणून थोडे पुढे पाठवले असता किल्ल्यावरुन खाली उतरण्याचा मार्ग सापडला आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.हळूहळू किल्ल्याच्या पायऱ्या उतरत रस्ता शोधण्यात आलेल्या अडचणी आणि चुकीचा मार्ग बरोबर आहे असे म्हणणाऱ्या सहकाऱ्यांची टिंगल टवाळी करत आम्ही पुन्हा किल्ल्याच्या पहिल्या पायरीपाशी पोहोचलो..ज्या ठिकाणी दुचाकी लावल्या होत्या त्या ठिकाणाजवळ एक मंदिर होते.ती खूण लक्षात ठेवून मग आम्ही हळूहळू किल्ल्यावरून खाली उतरत आमच्या दुचाकी पर्यंत पोहोचलो आणि आमच्या घराच्या दिशेने रवाना झालो.मात्र पुढील रविवारी दुसऱ्या किल्ल्यावर जायचं हे ठरवूनचं...

- संदीप जेजुरकर
   नांदगांव ( नाशिक )


Saturday, 15 February 2020

...अन तो सैन्यात भरती झाला.. मोलमजुरी करणाऱ्या अविनाशची प्रेरणादायी कहाणी..


...अन तो सैन्यात भरती झाला.. 
मोलमजुरी करणाऱ्या ' अविनाश ' ची प्रेरणादायी कहाणी..
     
- संदीप जेजुरकर, नांदगाव
           
         पाचवीलाच पूजलेल्या गरिबीमुळे एकवेळच्या जेवणाची देखील भ्रांत असायची..त्यातचं वडिलांचं छत्र हरपलं..अन ' अविनाश ' वर कुटुंबाचा ' भार ' पेलवण्याची जबाबदारी आली..कधी विटभट्टीच्या ट्रॅक्टरवर..सिमेंटच्या मालधक्क्यावर.तर कधी गवंड्याच्या हाताखाली काम करत कुटुंबाचा चरितार्थ अविनाश चालवत होता..हे सगळं करत असतांना त्याने देशसेवा करायची व सैन्यात भरती व्हायचं अस स्वप्न उराशी बाळगलं होतं आज ते स्वप्न सत्यात साकार झालं..एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या ' अविनाश ' ची ही धडपड अनेक तरुणांना प्रेरणादायी ठरेल..शहरातील ढासे मळा परिसरात राहणाऱ्या शिंदे कुटुंबीय अत्यंत हालाखीचे दिवस काढून जगत होतं..त्यातच कुटुंबाचा कर्ता असलेला अविनाशचा बाप संजय शिंदे हे आजरपणाने वारले..वडिलांचं छत्र हरपल्याने कुटुंबियांची जबाबदारी ' आई ' वर पडली..मोलमजुरी करून ती माऊली कुटुंब सांभाळू लागली..मुलं मोठे करायचे त्यांना शिक्षण द्यायचं हा विचार करत एकट्या आईची धावपळ सुरू होती..आईची धावपळ बघून आईला घरात मदत करावी म्हणून अविनाश व त्याचा लहान भाऊ दोघेही गवंड्याच्या हाताखाली काम करू लागले..एवढ्या लहान वयात मुलं मजुरी करताय हे आईला बघवत नव्हतं..पण परिस्थितीपुढे हतबल असलेल्या त्या आईने पोरांनो कामाबरोबर शिक्षण घ्या असा तिचा आग्रह असायचा..आयुष्यभर कष्ट करून आपले दिवस निघणार नाही असंघरातील मोठा असलेला ' अविनाश ' ला जाणवलं आणि मग त्याने सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची असं स्वप्न त्याने उराशी बाळगलं...आणि त्या दिशेने त्याचा प्रवास सुरु झाला..दिवसभर सिमेंट वाळूचे कामे करून सायंकाळी मैदानावर जावून सैन्य भरतीला अनुसरून तीन - तीन तास व्यायाम करायचा..त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यासही करायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला..अविनाशचा लहान भाऊ देखील त्याला या कामात मदत करायचा..हिसवळ येथील ज्ञानेश्वर बोगीर यांची त्याला मोलाची साथ मिळाली तांत्रिकदृष्ट्या त्यांनी अविनाशला सैन्य भरतीचे बाळकडू दिले..सुरुवातीला दोन ते तीन सैन्य भरत्यांमध्ये त्याला अपयश आले पण उराशी जिद्द बाळगलेलीच होती त्या दृष्टीने त्याने प्रवास सुरूच ठेवला आणि मुंबई येथील मुंब्राच्या मैदानात त्याने ' फिजिकल ' चे मैंदानही मारले..त्यानंतर लेखी परीक्षा दिली.. निकाल काय येतो याची उत्सुकता त्याला होतीच पण याही काळात त्याच रोजचं गवंड्याच्या हाताखाली काम करण्याचे ' रुटीन ' सुरूच होतेे..काल जेव्हा '  निकाल ' कळाला तेव्हा देखील अविनाश कामावरच होता..मित्राचा कॉल आला की तुझा सैन्य भरतीचा निकाल लागला आणि तू पास झाला..हे ऐकताच अविनाशला तर आभाळच ठेंगनं झालं..हे ऐकतांना अंगावर शहारे येत होते असं त्याने सांगितलं..आईला निकाल ऐकवला व पेढा भरवतांना दोघांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या..पोरांचा बाप गेल्यापासून पोर कष्ट उपसताय खूप हलाखीचे दिवस काढत इथपर्यंत पोरांनी ओढून आणलं याचा मला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रीया अविनाशच्या आईने पदराने डोळे पुसतांना दिली..

- संदीप जेजुरकर
  नांदगाव ( नाशिक ) 


Friday, 20 December 2019

माणसाने आयुष्य जगायचं तरी कसं..!

माणसाने_आयुष्य_जगायचं_तरी_कसं..!
           
               रोजची_तीच_नित्याचीच_धावपळ..दोन पैसे कमवायचे.. आणि उदरनिर्वाह साधायचा..हा सगळा खेळ साधतांना माणूस आपलं जगणं विसरत चालला आहे..माणसाचं आयुष्य खूप छोटे आहे..धकाधकीच्या या जीवनात माणसाला समाधानाने जगता आलं पाहिजे..अशी भावना प्रत्येकाने जपावी असं मला वाटतं.. दिवसाची सुरुवात झाल्यानंतर..कामाची लगबग.. त्यातच आजच्या दिवसभरातील कामे काय करायची ती यादी डोळ्यापुढे येते.. कामाला सुरुवातही होते..पण काय होतं ना त्यातल्या पहिल्या दुसऱ्या कामालाच अडथळे यायला सुरुवात होते आणि पूर्ण दिवसाचं शेड्युल अक्षरशः चुकून जातं.. पहिल्या कामाचा पाठपुरावा करतांनाच चीड चीड सुरू होते.त्यातही आपल्या मनासारखे काम होत नाही.यामुळे काय होते तर पूर्ण दिवसाचीच पुरती वाट लागून जाते.मला जे हवंय जे घडायला पाहिजे होते तसं न घडल्याने मग कंटाळा यायला लागतो..हताश झालेले मन मग कुठंतरी विरंगुळा शोधायला लागतो..पण काय असतं ना हा विरंगुळा शोधल्यानंतरही माणसाच्या मनात मात्र तीच कामाची कालवा कालव सुरू असते..पुन्हा कामात मन रमवाव लागतं..हे सगळं असंच चालत राहिलं तर माणसाला ताण तणावाला सामोरं जावं लागत.. नको त्या माणसाशी मग भांडण होतात..मग आपण ज्याला आपण आपलं मानलेलं असतं,गृहीत धरलेलं अशा माणसाकडे हक्काने जातो आणि त्याच्या पुढ्यात आपल्या समस्या मांडतो व त्याच्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा बाळगतो पण होत उलटंच ज्या कामासाठी आपण त्या व्यक्तीकडे गेलेलो असतो तोच व्यक्ती आपल्या कामाला विरोध दर्शवत असतो..किंबहुना ते कामच करत नाही..मग तिथे आपला भ्रमनिरास होतो..त्यावेळेला मात्र आपल्याला खूप काही आठवायला लागतं.. जी व्यक्ती अथवा संस्थेला आपण यापूर्वी छोटीशी का होईना मदत केलेली असते किंवा आपल्या माध्यमातून ती झालेली असते.अशी थोडी तरी जाणीव त्या व्यक्तीने ठेवायला हवी होती असं वाटायला लागून मन आणखी दुःखी होत..दिवसभरात आलेले हे अनुभव सोबत घेऊन माणूस मग हताश होऊन आपल्या घराकडे वळतो.त्याला वाटतं की आता आपण आपल्या कुटुंबियांसमवेत रमलो म्हणजे दिवसभरात आलेले वाईट अनुभव बाजूला सारून कुटुंबियांत रमण्याचा प्रयत्न करू पण तेथेही त्याचं दुर्दैव्य आडवं येत..आज दिवसभरात आपल्या समोर आलेल्या अडचणी कुटुंबियांना सांगण्याच्या आतच कुटुंबियांच्या असलेल्या अपेक्षा व अडचणी पुढ्यात येतात..की ज्याचं उत्तर याच्याकडे नसतं..पुन्हा कुटुंबियांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागतं.. हे असलं आयुष्य परमेश्वराने माणसाला दिलं आहे..असो या विषयाच्या शेवटी मी एवढंच म्हणेल की, क्षणभर सुखाचा शोध घेण्यासाठी व चांगले आयुष्य जगण्यासाठी निघालेल्या माणसाच्या पदरी मात्र नेहमी निराशा व दुःखाचाच डोंगर उभा ठाकलेला असतो मग माणसाने आयुष्य जगायचं तरी कसं..?

- संदीप जेजुरकर, नांदगांव ( नाशिक )
  - 9423151089

Thursday, 7 November 2019

अहो...' सरकार ' कधी स्थापन करणार ?

अहो...' सरकार ' कधी स्थापन करणार..?

           विधानसभेच्या निवडणुका झाल्या..या निवडणुकीत भाजप -  शिवसेना व मित्रपक्षांकडे महाराष्ट्रातील तमाम जनतेने कौल दिला..विजयी जल्लोषही करण्यात आला..पत्रकार परिषद  घेऊन जनतेचे आभार मानण्यात आले..लवकरच महायुतीचं सरकार या राज्यात स्थापन होईल असं वाटतं असतांना मात्र आज १५ दिवस उलटून गेले , विधानसभेची मुदतही आज संपणार असतांना या राज्यात सरकार मात्र स्थापन झालेलं नाही..कारण काय तर लोकसभा निवडणुकीच्या आधी मित्रपक्षांच्या जागा ठरवून उरलेल्या जागेत भाजप आणि शिवसेना यांनी फिफ्टी - फिफ्टी जागा लढवायच्या..सत्ता आली तर सत्तेतील पदांमध्ये समसमान वाटप करायचे असा फॉर्म्युला ठरला होता..असे शिवसेनेकडून सांगत सरकार स्थापनेसाठी आपला प्रस्ताव भाजप पुढे शिवसेनेने ठेवला..मात्र शिवसेनेला गृहीत धरलेल्या भाजप कडून या बद्दल काहीच रिप्लाय आला नाही.उलट मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं काहीच ठरलेलं नव्हतं ' असं एका अनौपचारिक गप्पांमध्ये जाहीर केलं..त्यामुळे झालं काय तर शिवसेनेचा स्वाभिमान ' इगो ' दुखावला गेला..आणि शिवसेनेकडून मग सामनाचे संपादक खासदार संजय राऊत पुढे आले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री पदाची मागणी करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचेसोर जे ठरलं त्यावर भाजपाने बोलावं असं ठणकावून सांगितलं..त्यानंतर श्री.राऊत यांनी जशी संधी मिळेल तस मित्रपक्ष भाजपाला चांगलेच धारेवर धरले..या दरम्यान, भाजपाची मात्र चांगलीच गोची झाली..भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदींनी शिवसेनेचे चिमटे काढत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देवून सरकार महायुतीचंच येणार हे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला..नुसता ठरला नव्हे तर तो संजय राऊत यांनी हाणून पाडला..राज्याच्या राजकारणात एकीकडे बलाढ्य असलेली भाजपा  या संजय राऊतांपुढे मात्र हतबल झाली..नुसती हतबल झाली नाही तर सपशेल लोटांगण घालायला पण आता तयार आहे..जनतेच्या मते मागील पाच वर्षांपासून सुरु असलेली शिवसेनेचे झालेली फरफट व त्याचा बदला अवघ्या पंधरा दिवसाच्या काळातच संजय राऊत यांनी घेतला असं बोलल्या जात आहे..गगनाला हात लावणाऱ्या भाजपाला पुन्हा एकदा जमिनीवर आणण्याचे काम संजय राऊत यांनी केलं..कायमच शिवसेनेला या ना त्या कारणावरून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांनीही भाजपाला ट्रोल करीत शिवसेनेच्या बाजूने मत मांडण्यास सुरुवात केली आणि शिवसेनेने दाखविलेल्या भूमिकेबद्दल कौतुक केले..आता सध्या काय सुरु आहे तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व किंगमेकर च्या भूमिकेत असलेले मा.शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे..राजकारणाला कलाटणी देणारं व्यक्तिमत्व आणि काहीतरी धक्कादायकच निर्णय घेवून आपले बुद्धीचातुर्य अबाधित ठेवत राजकारणात आपणच ' पावरफुल ' असल्याचे दाखवून देणारे श्री.पवार हे याप्रसंगी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे..असो
मी तर एवढंच म्हणेल राज्यातील शेतकरी जो यापूर्वी कोरड्या दुष्काळाने होरपळला होता तो यंदा मात्र ओल्या दुष्काळाने होरपळलेला आहे त्या शेतकरी राजाला लवकरात लवकर मदत व्हावी यासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी लवकर सरकार स्थापन व्हावं हीच तमाम महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे..

या सगळ्या घडामोडीत मला असं वाटतं की,...

• भाजपने जर बहुमताचा दावा केला तर ते बहुमत सिद्ध करू शकणार नाही..मात्र शिवसेनेने बहुमताचा दावा केला तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याने शिवसेना बहुमत सिद्ध करेल..

• जर भाजप - शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यात भाजपाच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद दिलं तर त्या पदावर देवेंद्र फडणवीस नसतील...

• अडीच - अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं तर त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री हा पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळेल..

• चार महत्वाच्या खात्यांपैकी दोन खाते शिवसेनेकडे असतील..

• शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून राज्यात सरकार स्थापन होऊ शकत त्याला काँग्रेस बाहेरून पाठींबा देईल..

• सत्तेपासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी वेळेप्रसंगी राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून मा.शरद पवार देखील बसू शकतात त्यास शिवसेना अटी शर्ती ठेवून पाठींबा देईल..

• राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही..असंही मला वाटतं

ता.क. - राज्यातील घडामोडींवर लिहिण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने आपल्या प्रतिक्रिया व सूचना अपेक्षित आहे..

- संदीप जेजुरकर,नांदगाव ( नाशिक )
   - ९४२३१५१०८९

Sunday, 8 September 2019

भटकंती - अंकाई किल्ला

 भटकंती - अंकाई किल्ला...
मनमाड पासून १४ कि.मी.दूर येवला तालुका हद्दीत..

पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते भटकंतीचे..आणि भटकंती साठी योग्य ठिकाण म्हणजे गड,किल्ले व डोंगररांगा.. मागील आठवड्यात पहिला पाऊस झाला आणि आज मग अंकाई किल्ल्यावर जायचं ठरलं..सकाळी सहा वाजेपासून मग मित्रांना नेहमीप्रमाणे कॉल सुरु झाले..प्रा.शिवाजी पाटील, वनरक्षक सुनील खंदारे व लहान बंधू निखिल याने अंकाई किल्ल्यावर भटकंतीसाठी जायला होकार दर्शविला..दोन दुचाकी सोबत घेऊन सकाळी ६ : ३० वाजता नांदगाव वरून स्वारी मनमाड पासून १४ कि.मी.अंतर दूर असलेल्या अंकाई किल्ल्याच्या दिशेने निघाली.. रस्त्यात पावसाचा थोडा शिडकावा झाला..नंतर मात्र पाऊस थांबला..बरोबर ४५ ते ५० मिनिटांनी मग आम्ही अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो..दुचाकी पार्क केली आणि किल्ल्याकडे बघितले.. त्याचवेळी आमचे मार्गदर्शक प्रवीण व्यवहारे सरांना कॉल केला आणि विचारले सर कुठं आहे ? तेव्हा सर डॉ.भागवत दराडे व तुषार गोयल यांच्यासमवेत अंकाई किल्ल्यावर पोहोचलेले सुद्धा होते..म्हटलं चला आता आपल्याला निघावं लागेल नेहमीप्रमाणे थोडंसं टेन्शन आलं..हल्ली फिरणं जरा कमी झाल्याने शरीर देखील सुस्त झालेलं..पण एकदा ठरलं की मग जायचंच हा ईरादा पक्का असल्याने स्वारी निघाली...वनरक्षक खंदारे आमच्या चौघांमधील ' फिट ' माणूस..आपल्या घड्याळातील Stopwatch लावून सुसाट सुटला..आणि डायरेक्ट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ ' आठ ' मिनिटात जाऊन पोहोचला सुद्धा आणि तेथून आम्हाला हात वर करत या लवकर असा आवाज पण दिला..तोपर्यंत आम्ही रस्ताच decide करत होतो..की कोणत्या रस्त्याने जायचं..! रस्ता मिळाला आणि आम्ही मजल दरमजल करत निघालो..आमचा चालण्याचा speed मात्र हळूच होता..तरीही थोडंसं थकल्यासारखं जाणवलं की आम्ही थांबून घेत होतो..असं करत करत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आम्ही पोहोचलो.. थोडीशी थट्टा मस्करी करत मग आमचं फोटो सेशन सुरु झालं..किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सुरुवातीलाच किल्ल्याची पडझड झालेली वास्तू बघितली की मनाला वाईट वाटायचं आज मात्र सुखद धक्काच बसला..पडझड झालेल्या किल्ल्याची डागडुजी करतांना अगदी त्याच धाटणीच्या त्याच दगडांनी भिंतीचे आणि किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांचे काम सुरु होते..खूप चांगल्या प्रतीचे काम बघून मनाला समाधान वाटले..पुन्हा किल्ल्यावर चढाई सुरु झाली..अंकाई किल्ल्याच्या मध्यावर गेल्यानंतर तेथून टंकाई किल्ला व हडबीची शेंडी व स्वतःचे हि फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले..आणि पुढचा प्रवास सुरु झाला..वाटेत प्रवीण व्यवहारे सर , डॉ.भागवत दराडे व तुषार गोयल यांची भेट झाली..थोड्याशा गप्पा मारत दोन सेल्फीही खेचले..आता किल्ल्याच्या पायऱ्या संपल्या होत्या.किल्ल्यावरील दगडात कोरलेले पाण्याचे टाके व कोरीव काम बघितले..किल्ल्यावरील अगस्ती ऋषी आश्रम व तेथील मंदिरात दर्शन घेत पुन्हा पुढे चालू लागलो पाण्याचे तळे व छोटी छोटी दोन मंदिरे बघितले..आमच्या सारखे अनेक पर्यटक आज रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी किल्ल्यावर भटकंती करत होते..पुढे गेल्यानंतर मग डोंगरावर पांघरलेली मनमोहक हिरवळ लक्ष वेधू लागली..किल्ल्यावर चढतांनाचा थकवा या हिरवळीने आमच्याकडून हिरावून नेला..मस्त रमत - गमत पुढे चालतच होतो.किल्ल्याच्या शेवटच्या भागापर्यंत आम्ही पोहोचलो..तिथे ' मोठे बाबा ' या दर्ग्याच दर्शन घेतलं..तेथूनच मनमाड - येवला रस्त्यावरील विहंगम असे दृश्य नजरेत व कॅमेऱ्यात कैद केले..तर दुसऱ्या बाजूला हडबीची शेंडी ( thums up ) पण इकडे या अशी खुणावत होती..किल्ल्याचा शेवटचा टप्पा असल्याने थोडेसे ' दबंग व स्टायलिश ' फोटोसेशन तेथे केलं.वनरक्षक सुनील खंदारे , प्रा.शिवाजी पाटील व मी भिंतीवरून उड्या मारण्याचा आनंद ही याच ठिकाणी लुटला..हे सगळं टिपण्याचं काम निखिल करतच होता..मग घड्याळाकडे बघितलं आणि वेळ झाला म्हणून परतीच्या प्रवासाला लागलो..हळु हळू करत किल्ल्यावरून खाली उतरू लागलो..किल्ला उतरतांना पायाला मात्र थोडं जाणवायला लागलं..पाय उचलतांना थोडी कसरत करावी लागत होती.त्यातच पाऊस झालेला असल्याने ओलाव्यामुळे पायऱ्या निसरड्या होवून सरकण्याचे चान्सेस जरा जास्तच होते..पण तोल सावरत हळू हळू मार्गक्रमण सुरु झालं..आणि पायथ्याला पोहोचत किल्ल्याचा प्रवास थांबवला..आपल्या दुचाकीला किक मारत किल्ल्याची सफर छान झाली असे म्हणत मनमाड गाठले..मनमाड बस स्थानकाजवळील ' श्री.दत्त टी स्टॉल ' वर मस्त वाफाळलेला चहा मारला आणि मग नांदगावकडे प्रयाण केले..
- संदीप जेजुरकर, नांदगाव ( नाशिक ) 
  भ्रमणध्वनी - ९४२३१५१०८९

ए मेरे वतन के लोगो...जरा आँख में भरलो पाणी...

नांदगाव : अमर रहे , अमर रहे...वीर जवान अमर रहे..भारत माता की जय..
           अमर रहे , अमर रहे...वीर जवान अमर रहे..भारत माता की जय..आदी घोषणा देत आज क-ही ( ता.नांदगाव ) येथील शहीद जवान मल्हरी खंडेराव लहिरे ( वय - २७ ) यास लष्करी जवानांच्या उपस्थितीत  शासकीय इतमामात ' बौद्ध पद्धतीने ' अखेरचा निरोप देण्यात आला.
           
जामनगर  ( गुजरात ) मधील एडीआरटीच्या युनिटमध्ये शस्त्रगाराची सुरक्षा करीत असतांना मल्हरी याचे अंगावर विज पडुन तो शहीद झाला होता..याप्रसंगी गहिवरलेल्या अवस्थेत ' माझा राजा मला सोडुन  का गेला..' अशी आर्त हाक देत  मल्हरीची पत्नी ' शीतल ' च्या अश्रूंचा बांध आज फुटला होता..बापानं काबाड कष्ट करत माझ्या लेकराला सैन्यात नोकरीला लावलं..आता कुठं आम्हाला सुगीचे दिवस आले होते त्यात माझा मल्हरी मला सोडून गेला..असे सांगत मल्हरीची आई ' सुशिलाबाई ' धाय मोकलून रडत - रडत आपल्या मुलाच्या आठवणी सांगत होती..तर चार वर्षाचा चिमूरडा ' सार्थक ' हातात तिरंगी ध्वज घेऊन अभिमानाने मिरवत होता...नेमकं काय सुरु आहे हेच त्याला कळत नव्हतं..मल्हरीचा ' बाप ' तर निःशब्द झाला होता..पोटच्या गोळ्याला आपल्याच डोळ्या देखत अग्निडाग त्यांना द्यायचा होता..हे सगळे गहिवरलेले प्रसंग बघून उपस्थित्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या..मनमाड जवळील क-ही ( ता.नांदगाव ) या गावात राहणाऱ्या खंडेराव लहिरे मुलगा मल्हारी हा २०१२ यावर्षी सैन्यात भरती झाला होता. गुजरात मधील जामनगर येथे तो कार्यरत होता. एडीआरटीच्या युनिटमध्ये शस्त्रगाराची सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर होती. एका उंच ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असताना  शुक्रवारी ( दि.६ ) त्याचे अंगावर वीज पडल्यानं त्याचा अपघाती मृत्यू झाला होता.चार वर्षांपूर्वीच त्याचा विवाह शीतल सोबत झाला होता. सार्थक हा चार वर्षाचा मुलगा त्यांना आहे..काल ( दि.७ ) मध्यरात्री त्याचे पार्थिव मनमाड शहरातील पोलीस स्थानकात दाखल होऊन आज सकाळी ८ वाजता मूळगावी क-ही येथे मिलिटरीच्या खास वाहनाने आणण्यात आले..कुटुंबियांची भेट घडविल्यानंतर सजविलेल्या रथातून अमर रहे अमर रहे..वीर जवान अमर रहे..भारत माता की जय..आदी घोषणा देत पोलिसांचा ताफा, पार्थिवाच्या दोन्ही बाजूला मानवी साखळी अशा लवाजम्यासह भावपूर्ण वातावरणात त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली..यावेळी उपस्थित असलेल्या आर्मी सुभेदार डी.एल.राख, हवालदार बाळू घुगे, ज्ञानेश्वर आव्हाड आदींसह खासदार भारती पवार, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ सभापती मनीषा पवार, रत्नाकर पवार, पंचायत समितीच्या सभापती विद्या पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार मनोज देशमुख, गटविकास अधिकारी खताळे, मनमाड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी समरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दशरथ लहिरे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, बबलू पाटील, सरपंच ज्योती लहिरे, माजी सैनिक नानासाहेब काकळीज आदींनी पुष्पचक्र अर्पण केले..आपल्या मुलाची आठवण आणि त्याच्या आहुतीचे प्रतीक म्हणून पार्थिवावर लपेटलेला राष्ट्रध्वज (तिरंगा ध्वज) परिवाराच्या स्वाधीन करण्यात आला.चार वर्षाच्या सार्थक ने आपल्या पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला..यावेळी १९०७ लाईट रेजिमेंट ,देवळाली कॅम्प ( नाशिक ) च्या नायब सुभेदार योगेंद्र सिंह, हवालदार बाचकार सिंह, वीर नामदेव, नायक अश्विनकुमार, लान्सनायक इंद्रजीत सिंग, अजयकुमार, नटराजन, विवेकानंद, राकेशकुमार, राहुलचंद्रा, दिपककुमार आदी जवानांच्या युनिटसह मनमाड पोलिसांनी सलामी देत तीन राऊंड फायर करत आपल्या सहकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली..अंत्ययात्रेस राजकीय पदाधिकारी , विविध खात्याचे शासकीय अधिकारी, माजी सैनिक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आदींसह पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येने ग्रामस्थ,आप्तेष्ट व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

- संदीप जेजुरकर, नांदगाव 
   नाशिक -
 - ९४२३१५१०८९

Thursday, 6 June 2019

नांदगाव तालुक्याचे आरोग्य सांभाळणारा एक ' देवदूत '

         आपल्या रुग्णसेवेतून ज्यांनी अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला व ज्यांना तालुक्यातील जनतेने ' दैवत्व ' बहाल केले असे डॉ.रोहण निंबाजी बोरसे..नांदगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट करत एक नव्हे दोन नव्हे तर ग्रामीण रुग्णालयाला व स्वकर्तृत्वामुळे डॉ.आनंदीबाई जोशी, कायाकल्प असे अनेक पुरस्कार ज्यांनी मिळवले आजही विविध संस्थाद्वारे त्यांना नेहमीच गौरविण्यात येते असे आमचे मोठे बंधू तथा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे..ग्रामीण रुग्णालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री.बोरसे यांनी रुग्णालयाचा कायापालट सुरु केला..जिथे ४५ ते ५० बाह्यरुग्ण तपासले जायचे तिथे आज मात्र ३०० हुन अधिक बाह्यरुग्ण तपासले जातात..सर्पदंश, अपघात , साथीचे आजार आदी रुग्णांची येथे मोठी संख्या असते.पण डॉ.बोरसे आणि त्यांची संपूर्ण टीम अगदी निस्वार्थ भावनेने आपली रुग्ण सेवा बजावत असतांना रुग्णाबरोबर एक भावनिक नातेही जोडत असते..ग्रामीण रुग्णालय, नांदगावची एक वेेगळी ओळख तयार झाली आहे.गरोदर महिलांची प्रसूती कशी ही असो अगदी सहजरीत्या ती रुग्णालयात प्रसूत होणारच.. हा या रुग्णालयाचा विशेष हातखंडा..मागील एक वर्षात तब्बल १ हजाराहून अधिक महिला प्रसूत होण्याचा आकडा पार केला गेला..कोकणातील सर्पदंशावरील उपचारात प्रसिद्ध असलेले डॉ. बावस्कर यांच्या पुस्तकांचे वाचन करून प्रेरित झालेल्या डॉ.रोहन बोरसे यांनी आजतागायत अनेक सर्पदंश झालेल्या रुग्णांचे प्राण वाचविलेले आहे..प्रसंगी आजही ते डॉ.बावस्कर यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधत सर्पदंशावरील अधिक उपचाराविषयी माहित घेत असतात..ग्रामीण रुग्णालयात आरोग्य अधिक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ.रोहण बोरसे हे नुसतीच नोकरी न करता त्यातुन मोठ्या प्रमाणात समाज सेवा देखील करतात..स्मितभाषी व नम्रता अंगिकारलेल्या डॉ.बोरसे हे तालुक्यात आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर ' किर्तीवंत ' झाले आहे..साकोरा ( ता. नांदगाव ) येथील मूळचे रहिवासी असलेले डॉ.रोहन बोरसे यांचे कुटुंबीय सध्या नोकरी निमित्ताने मुंबईत स्थायिक आहेत..पण वडील निंबाजी बोरसे यांचा खास आग्रह असल्याने व जन्मभूमी असलेल्या नांदगावं तालुक्यात जर सेवा बजावता येईल तर विशेष असा आनंद होईल अशी वडीलांची इच्छा होती..त्यानुसार २०११ या वर्षी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षकपदावर त्यांची नियुक्ती झाली..आणि वडिलांच्या इच्छेनुसार आपल्या सेवेच्या माध्यमातून त्यांनी या संधीचे सोने केले..विविध समस्यांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालय हे ग्रासलेले होते.जेव्हा डॉ.रोहण बोरसे यांनी या रुग्णालयाची सूत्रे हातात घेतली तेव्हापासून ते आजतागायत त्यांनी रुग्णालयाचा चेहरा -मोहराच बदलवत एक वेगळी ओळख निर्माण केली..गरुजू रुग्णांना आपल्या खिशातील पैसे देवून पुढील उपचारासाठी मदत देखील केल्याचे अनेक उदाहरणे त्यांचे आहेत.समाजाप्रती असलेले त्यांचे प्रेम या माध्यमातून दिसून येते..अगदी मोजक्या संख्येने ग्रामीण रुग्णालयाची उपचारासाठी वाट धरणारे आज शेकडोच्या संख्येने दाखल होतात..अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने देखील हे रुग्णालय आता सुसज्ज होत आहे..ग्रामीण रुग्णालयातील माझे सर्व कर्मचारी निष्ठेने काम करतात.त्या कामाच्या प्रति निष्ठा असल्याने यश आपोआपच मिळत असते.माझ्या वडिलांनी दिलेला मोलाचा सल्ला आत्मसात करून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून काम सुरु केले.समस्त नांदगावकरांच्या सहकार्यामुळेच विविध पुरस्कारांपर्यंत मजल मारता आल्याचे श्री.बोरसे सांगत आपल्या मनाचा मोठेपणा दाखवतात..डॉ.रोहण बोरसे यांच्याविषयी शेवटी एकच म्हणावं लागत की नांदगाव तालुक्याचं आरोग्य जोपासणारा एक देवदूतच आमच्या तालुक्याला लाभला आहे..ज्या देवाने मलाही एकदा ' जीवदान ' दिलं आहे..

- संदीप जेजुरकर

  सदस्य - रुग्ण कल्याण समिती
  ग्रामीण रुग्णालय,नांदगाव ( नाशिक ) 

- ९४२३१५१०८९


Sunday, 19 August 2018

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली..ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या...

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
      ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या...

नांदगाव : संदीप जेजुरकर

        संपूर्ण शरीर हे व्याधींनी ग्रासलेले..उदरनिर्वाहाचे काहीही साधन नाही..सध्या दोन वेळची जेवणाची भ्रांंत..कुणी दिलं तर 
खायचं..नाही भेटलं तर तसंच पडून राहायचं..रहायला हक्काचा निवारा नाही..आपल्या काडकीच्या झोपडीत कसंबसं पडून रहायचं..आणि आजचा दिवस उद्यावर ढकलायचा..एवढीच त्याची दिनचर्या..अठरा विश्वे दारिद्रय पाचीला पुजलेल्या रंगनाथ पवार यांना ' कुणी घर देतं का घर ' अशी म्हणण्याची वेळ आलेली असतांनाच सामाजिक कार्य करणाऱ्या युवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने त्यास मदतीचा हात दिला.. रविवार सुटीचा दिवस असतांना कुठेतरी मौज मजा एन्जॉय करण्यात दिवस घालवायचा हे आजच्या तरुणाईचं ब्रीद ठरलेलं असतांना ' युवा फाउंडेशन ' या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मात्र त्यास फाटा देत ' एक हात मदतीचा ' हि संकल्पना राबवत श्रमदान करून श्री.पवार यांच्या झोपडीची दुरुस्ती केली..झोपडीची सुस्थितीतील दुरुस्ती बघून रंगनाथ पवार यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या..आपले थरथरते हात उंचावून त्याने या युवकांना आशीर्वाद देत ' तुमचं कल्याण होईल ' असा आशीर्वाद दिला..कैलास नगर जवळील एका वस्तीवर शारीरिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या रंगनाथ पवार हे एका दयनीय अवस्थेतील आपल्या झोपडीत कसेबसे दिवस काढत असत.पावसाळा सुरू झाला की हे गृहस्थ रात्र रात्र जागून काढत होते.उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूत चोहो-बाजूने उघडीच असलेली हि झोपडी शेवटच्या घटका मोजत होती. दिवाळीचे फरसाण व कपडे वाटप करण्यासाठी गेलेल्या युवा फाउंडेशनच्या नजरेत हि झोपडी खटकली होती..आणि आज या सामाजिक संस्थेने पुढाकार घेत या झोपडीची दुर्दशा दूर करण्याचे ठरवले आणि आपल्या सवंगड्यांसह झोपडी दुरुस्ती करत रविवारची सुट्टी खऱ्या अर्थाने सत्कारणी लावली..या झोपडीच्या चारही बाजू बंद करीत एक नवी कोरी ताडपत्री त्यावर अंथरूण कायमचा भक्कम असा निवारा श्री.पवार यांना करून दिला..या श्रमदानात छत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम सर यांचे मोठे योगदान लाभले तर झोपडी दुरुस्तीसाठी युवा फाउंडेशनचे प्रसाद वडनेरे, सुमित सोनवणे, रूषी जाधव, विकास शर्मा, धनराज शिदें, गौरव रूणवाल, सद्दाम शेख, मुज्जु शेख, मयुर लोहाडे, राहिल सैय्यद, गणेश सांगळे, तौसिफ शेख, साद शेख, सचिन धामणे, राहुल ठोके आदींनी मदत केली..

Sunday, 31 December 2017

शुभेच्छा..नवीन वर्षाच्या...

📌📌

नमस्कार...
माझ्या सर्व मित्र परिवाराला...!

            २०१७ हे वर्ष कसे गेले..यावर अनेकांनी आपल्या फेसबुक / व्हाट्स अपच्या माध्यमातून आपल्या भावना विषद करत पोस्ट केल्या...कुणी नवीन वर्षाचे संकल्प केलेत तर कुणी मागील वर्षात घडलेल्या आठवणींना उजाळा देत..नवीन वर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करीत आहे..येणाऱ्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मनात एक विचार आला कि आपणही २०१७ हे वर्ष आपल्याला कसं वाटलं याविषयी आपले विचार आपल्या मित्रांकडे व्यक्त करावेत थोडासा संवाद साधावा म्हणून केलेला हा शब्द प्रपंच..
         मित्रांनो उगवलेला प्रत्येक दिवस हा मावळणारच असतो..त्याचप्रमाणे नवीन वर्ष सुरु झालं की ते देखील संपणारच यात काही शंकाच नाही..म्हणजे वर्ष संपलं यात विशेष काहीच नाही..येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यातील शेवटचाच दिवस आहे..असे समजून मी मागील प्रत्येक दिवस हा एन्जॉय ( साजरा ) करतोय..आणि पुढील २०१८ या नवीन वर्षातही तेच करणार आहे..प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही  सुख दुःख व इतर अनेक घटना घडत असतात..अर्थात सरळ रस्त्याला असलेले वळण व चढ उतार येतात त्या प्रमाणे माणसाच्या आयुष्यातही असे काही प्रसंग येत असतात..सुखाचे अनेक प्रसंग मागील वर्षी ( २०१७ ) माझ्या नशिबी आले..तसेच काही प्रसंग माझ्याही आयुष्यात आले..कधी गंभीर स्वरूपाचे तर कधी थोडेसे सॉफ्ट ( हलकेसे ) देखील..या प्रसंगात माझ्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी, माझ्या सर्व जिवलग मित्र परिवाराने व माझ्यावर प्रेम करणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मोठी साथ दिली..जिथे साक्षात मृत्यू माझ्या समोर येऊन दाखल झाला आहे असे मला वाटत असतांना.." तुला काहीच झाले नाही " असे माझ्या मित्रांचे बोल मला त्या मृत्यूच्या दारातून परत घेऊन आले..अचानक झालेल्या या घटनेने मी ही गोंधळलेलो होतो..काय होतंय किंवा काय झालंय हे मलाही समजत नव्हतं..आजही मी तो विचार करायला लागलो कि तो घडलेला प्रसंग मला आठवतो..व मी स्तब्ध होतो..प्रसंग कोणताही असो त्या प्रसंगाला सामोरे जाणारा मी या प्रसंगाला मात्र घाबरलो...खूप मोठी हिम्मत माझ्यात होती..पण आता मात्र ती हिम्मत जरा कमी झालेली मला वाटते.. असो.. यापलीकडे मागील ( २०१७ ) या वर्षात खूप काही गमावलं अथवा कमावलं असं झालेलं नाही..मित्र परिवाराची संख्या मोठी कमावली आजही ती वाढतच आहे..खूप काही अनुभव मिळाले..त्यात अनेक गोष्टी शिकायला देखील मिळाल्या..पत्रकारिता करतांना अनेक अनुभव आले...पुरस्कारही मागील वर्षी पदरात पडला..नावलौकिक मिळवतांना अनेकांनी कौतुकाची थाप पाठीवर दिली..सामाजिक कार्यात स्वताला गुंतवून घेतलं..परिवाराची हि मोठी साथ यात मिळत असते..अजूनही खूप काही करायचे आहे..या सर्व घडामोडीत दैनंदिन जीवन जगत असतांना कुणाच्या भावना माझ्याकडून दुखावल्या गेल्या नाही..ज्यांच्या म्हणून दुखावल्या गेल्या असतील त्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलं..येणाऱ्या नवीन वर्षात खूप काही संकल्प न करता " एक माणूस " म्हणून जसं आजपर्यंत जगत आलोय तेच पुढील काळातही " एक माणूस " म्हणूनच मला जगायचं आहे..प्रत्येक दिवस हा नवीन दिवस व नवीन वर्ष म्हणून जगायचं आहे..येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आनंद मिळवायचा आहे..आणि महत्वाचं म्हणजे आजचा दिवस हा माझ्या आयुष्यतील शेवटचा दिवस म्हणून मी जगणार आहे..' लाईफ एन्जॉय ' करणार आहे..हाच संकल्प मी आजपासून केलेला आहे..पुनश्च एकदा माझ्या सर्व मित्र परिवाराला हे नवीन वर्ष सुख - समृद्धीचे व भरभराटीचे जावो..येणाऱ्या  ( २०१८ ) या वर्षात आपल्या सर्वांच्या हातून आई - वडिलांची सेवा,समाजसेवा व देशसेवा घडो..ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा...

- संदीप जेजुरकर, नांदगाव
  

नूतन वर्षाभिनंदन...!

📌📌

नमस्कार...
माझ्या सर्व मित्र परिवाराला...!

            २०१७ हे वर्ष कसे गेले..यावर अनेकांनी आपल्या फेसबुक / व्हाट्स अपच्या माध्यमातून आपल्या भावना विषद करत पोस्ट केल्या...कुणी नवीन वर्षाचे संकल्प केलेत तर कुणी मागील वर्षात घडलेल्या आठवणींना उजाळा देत..नवीन वर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करीत आहे..येणाऱ्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मनात एक विचार आला कि आपणही २०१७ हे वर्ष आपल्याला कसं वाटलं याविषयी आपले विचार आपल्या मित्रांकडे व्यक्त करावेत थोडासा संवाद साधावा म्हणून केलेला हा शब्द प्रपंच..मित्रांनो उगवलेला प्रत्येक दिवस हा मावळणारच असतो..त्याचप्रमाणे नवीन वर्ष सुरु झालं की ते देखील संपणारच यात काही शंकाच नाही..म्हणजे वर्ष संपलं यात विशेष काहीच नाही..येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यातील शेवटचाच दिवस आहे..असे समजून मी मागील प्रत्येक दिवस हा एन्जॉय ( साजरा ) करतोय..आणि पुढील २०१८ या नवीन वर्षातही तेच करणार आहे..प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही  सुख दुःख व इतर अनेक घटना घडत असतात..अर्थात सरळ रस्त्याला असलेले वळण व चढ उतार येतात त्या प्रमाणे माणसाच्या आयुष्यातही असे काही प्रसंग येत असतात..सुखाचे अनेक प्रसंग मागील वर्षी ( २०१७ ) माझ्या नशिबी आले..तसेच काही प्रसंग माझ्याही आयुष्यात आले..कधी गंभीर स्वरूपाचे तर कधी थोडेसे सॉफ्ट ( हलकेसे ) देखील..या प्रसंगात माझ्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी, माझ्या सर्व जिवलग मित्र परिवाराने व माझ्यावर प्रेम करणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मोठी साथ दिली..जिथे साक्षात मृत्यू माझ्या समोर येऊन दाखल झाला आहे असे मला वाटत असतांना.." तुला काहीच झाले नाही " असे माझ्या मित्रांचे बोल मला त्या मृत्यूच्या दारातून परत घेऊन आले..अचानक झालेल्या या घटनेने मी ही गोंधळलेलो होतो..काय होतंय किंवा काय झालंय हे मलाही समजत नव्हतं..आजही मी तो विचार करायला लागलो कि तो घडलेला प्रसंग मला आठवतो..व मी स्तब्ध होतो..प्रसंग कोणताही असो त्या प्रसंगाला सामोरे जाणारा मी या प्रसंगाला मात्र घाबरलो...खूप मोठी हिम्मत माझ्यात होती..पण आता मात्र ती हिम्मत जरा कमी झालेली मला वाटते.. असो.. यापलीकडे मागील ( २०१७ ) या वर्षात खूप काही गमावलं अथवा कमावलं असं झालेलं नाही..मित्र परिवाराची संख्या मोठी कमावली आजही ती वाढतच आहे..खूप काही अनुभव मिळाले..त्यात अनेक गोष्टी शिकायला देखील मिळाल्या..पत्रकारिता करतांना अनेक अनुभव आले...पुरस्कारही मागील वर्षी पदरात पडला..नावलौकिक मिळवतांना अनेकांनी कौतुकाची थाप पाठीवर दिली..सामाजिक कार्यात स्वताला गुंतवून घेतलं..परिवाराची हि मोठी साथ यात मिळत असते..अजूनही खूप काही करायचे आहे..या सर्व घडामोडीत दैनंदिन जीवन जगत असतांना कुणाच्या भावना माझ्याकडून दुखावल्या गेल्या नाही..ज्यांच्या म्हणून दुखावल्या गेल्या असतील त्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलं..येणाऱ्या नवीन वर्षात खूप काही संकल्प न करता " एक माणूस " म्हणून जसं आजपर्यंत जगत आलोय तेच पुढील काळातही " एक माणूस " म्हणूनच मला जगायचं आहे..प्रत्येक दिवस हा नवीन दिवस व नवीन वर्ष म्हणून जगायचं आहे..येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आनंद मिळवायचा आहे..आणि महत्वाचं म्हणजे आजचा दिवस हा माझ्या आयुष्यतील शेवटचा दिवस म्हणून मी जगणार आहे..' लाईफ एन्जॉय ' करणार आहे..हाच संकल्प मी आजपासून केलेला आहे..पुनश्च एकदा माझ्या सर्व मित्र परिवाराला हे नवीन वर्ष सुख - समृद्धीचे व भरभराटीचे जावो..येणाऱ्या  ( २०१८ ) या वर्षात आपल्या सर्वांच्या हातून आई - वडिलांची सेवा,समाजसेवा व देशसेवा घडो..ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा...

- संदीप जेजुरकर, नांदगाव 
  

Saturday, 19 August 2017

...नांदगावकरांचा अखेरचा प्रवासही सुखकर नाही.

...नांदगावकरांचा अखेरचा प्रवासही सुखकर नाही.

नांदगाव : संदीप जेजुरकर

    '' इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...'' या कवी सुरेश भटांच्या कवितेतून माणसाचे जिवन खर तर खूपच खडतर आहे..मृत्यूनंतरच त्यातून सुटका होते याचा प्रत्यय येतो.. मात्र माणसाच्या मृत्युनंतरही सुटका नशिबी नसल्याचा प्रत्यय सध्या नगरपरिषद आरोग्य विभागाच्या अक्षम्य अशा दुर्लक्षामुळे नांदगावकरांना येत आहे.." काल ( दि.१६ ) जेष्ठ पत्रकार तथा गणेश न्यूज एजन्सीचे संचालक गजानन ( बापू ) आहेर यांच्या अंत्यविधी प्रसंगी अनुभवायास मिळाले..स्मशानभूमीत वीजपुरवठा नसल्याने  गडद असलेल्या अंधारात अंत्यविधी करण्याची वेळ आहेर कुटुंबियावर आली..मोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये अंत्यविधी उरकावा लागला.. अंत्यविधीसाठी आलेल्या अनेकांना ते खटकले सुद्धा.. अंत्यविधीप्रसंगी गेलेल्या व्यक्तीच्या चांगल्या वाईट गुणांची चर्चा करत स्मशानभूमीत निरोप दिला जातो. मात्र नांदगावच्या स्मशानभूमीची दुरावस्थेची चर्चा करत यावेळी अंत्यदर्शन करण्यात आले..वेळोवेळी समशानभूमीची स्वच्छता आवश्यक असते मात्र स्वच्छतेचा दूरदूरपर्यंत लवलेशही इथेही बघायला मिळाला नाही..अंत्यदर्शनाप्रसंगी बसण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये मोठमोठाले गवत उगवलेले आहे.बसण्यासाठी कमी मात्र गवताने मोठी जागा तेथे व्यापलेली आहे..परिणामी या गवतामुळे डासांचा मोठा प्रादुर्भाव स्मशानाभूमीत जाणवला.. या डासांच्या त्रासामुळे अंत्यदर्शनासाठी जमलेल्या शोकाकुल जनतेची चुळबुळ सारं काही अलबेल नसल्याचे सांगत होती..मृतदेहाला अग्नी डाग देण्यापूर्वी लाकडे रचण्यासाठी कठडे नाही. पाणी योजना तिथे राबविलेली नसल्याने अंत्यविधी प्रसंगी हातपंपावरील पाण्याचा वापर करावा लागतो.उन्हाळ्यात या हातपंपास पाणी नसल्याने देखील मोठी गैरसोय होते. कायमस्वरुपी वीज पुरवठा नसल्याने दिवाबत्तीची सोय नाही.अशा अनेक नागरी सुविधांचा अभाव या स्मशानाभूमीत जाणवतो. अंत्यसंस्कारासाठी  जाणाऱ्या रस्त्यावरील विवेक हॉस्पिटल मागील शाकंबरी नदीवरील पुलाची झालेली दुरावस्था देखील नसल्याचे अधोरेखित करते.नगरपरिषदेच्या विकास आराखड्यात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शाकंबरी नदीवरील पुलाच्या कामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेले आहेत.मात्र शासन स्तरावरून निधीची मंजुरी नसल्याने पुलाचे हे काम रखडले असल्याचे समजले..दरम्यान मरणानंतरही मृदेहाला मरणासन्न अवस्था सहन करावी लागत असल्याने स्मशानभूमी दुरावस्थेकडे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

भोलेनगर स्मशानभूमीची दुरावस्था  -

शहरातील भोलेनगर येथील दुसऱ्या स्मशानभूमीची अवस्था देखील अशीच आहे.. अंत्यविधी सुरु असतांना छताचा काही भाग कोसळण्याचे प्रकार देखील भोलेनगर येथील स्मशानभूमीत घडले आहे. आजही स्मशानभूमीच्या छताला तडे गेले असल्याने छत कोसळण्याची शक्यता तिथे आहे. या स्मशानभूमीच्या कामास मध्यंतरी सुरुवात झाली होती खरी मात्र सध्या हे काम थांबलेले आहे..वेळेत काम न केल्याने संबंधित ठेकेदाराला परिषदेकडून नोटीस बजावल्याचे देखील समजते.       

स्मशानभूमीतील मरण यातना - 

अंत्यसंस्कारप्रसंगी ठेवण्यात येणाऱ्या मृतदेहास संरक्षण कठडे देखील नाही..

* स्मशानभूमीत कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था नाही..हातपंप आहे मात्र उन्हाळ्यात त्यास पाणी नाही..  

* स्मशानभूमीत असलेल्या शौचालयाची दुरावस्था मोठे गवत त्यात वाढलेले आहे.. 

* अंत्यसंस्कारानंतर उरलेली रक्षा टाकण्यास जागा नसल्याने बाजूला कुठेतरी ती टाकली जाते.

* स्मशानभूमीतील कचरा ( तिरडीचे बांबू ,कपडे ) तिथेच बाजूला टाकला जात असल्याने मोठी अस्वच्छता..